नांदेड :
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण प्रकरणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला असून दोन्ही समाज आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. उपवर्गीकरण विषयावर तोडगा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेला प्रा. देविदास मनोहरे, जनार्दन कवडे, जेष्ठ पत्रकार बंधुराज लोणे, नंदकुमार बनसोडे हे उपस्थित होते.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले की, उपवर्गीकरण विषय सुरू झाला त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून हा विषय पुढे आला. दोन समाज आमनेसामने आले हे माझ्या दृष्टीने योग्य नाही, भविष्यात ओबीसी, आदिवासी समाजात देखील उपवर्गीकरणाची मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे समाजात दुफळी माजण्याची जास्त शक्यता आहे. सरकारने आपल्या फायद्यासाठी उपवर्गीकरणाचा विषय पुढे केला आहे. यावरून दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना संसदीय अभ्यास असून अनेक समाजातील नेत्यांचा बाळासाहेब आंबेडकर यांचा चांगला संवाद आहे.ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उपवर्गीकरण विषयांत पुढाकार घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढे यावी अशी विनंती केली आहे. तसेच राज्य सरकारने हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी अशी मागणी सुरेश गायकवाड यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरील मोर्चा संदर्भात बोलताना गायकवाड म्हणाले की, मोर्चा काढून हा विषय सुटत नाही. त्यामुळे सरकार आणि राजकीय वाटाघाटीतून हा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले.
