बेळगांव ,प्रतिनिधी :-
बेळगांव येथील ‘ पहिल्या बालनाट्य संमेलना ‘ ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.
बेळगांवमध्ये प्रसिद्ध अश्या अनघोळ येथे मुंबईच्या ‘ बालरंगभूमी अभियान ‘ द्वारे ‘ १ल्या बेळगांव बालनाट्य संमेलना ‘ चा प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झाला .
याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले , “ मला वडिलांनी सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं . यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला . आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे . गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की , बालनाट्याची परंपरा संपली आहे . लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाही , मालिका नाही , काही नाही आहे . आपण मुलांसाठी काही करत नाही . समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही . ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे . पुण्यात मुलांना खेळायचे असेल , तर दुर्दैवाने मैदान नाही . इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते . उत्तम बाग नाही , जिथे मुले खेळू शकतात . मुलांनी खेळायचे नाही , असे आपण ठरवले आहे .
कोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले . आता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहे . मी लहानपणी जी बाल नाटके पाहिली , त्याची छबी आजही मनावर ताजी आहे . आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत . जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील . आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहे , तो नाटकातून बाजूला व्हायला हवा . घरी आई बाबा शहाणपणा शिकवतात , शाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतात , परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे . मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे . नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे . नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे , हे जेव्हा त्यांना कळेल , तेव्हा मुले नाटकाकडे येतील “.
बेळगांवच्या अनघोळ येथील ‘ संत मीरा हायस्कूल ’ मध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमधे मुंबई , बेळगांव , कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी , विद्यार्थिनी सहभागी झाले होते . ६० – ६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली . गेली दोन दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्यसंमेलनात प्रशिक्षणसोबतच विविध बालनाट्य पहाण्यासाठी मशगूल होते , यासोबतच त्यांनी अभिनेते सुबोध भावे , अभिनेत्री सई लोकूर , अभिनेते प्रसाद पंडित , संमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक , ‘ बालरंगभूमी अभियान , मुंबई ‘, ‘ फुलोरा नाट्य संस्थे ‘ च्या अध्यक्षा वीणाताई लोकूर , ‘ अखिल भारतीय नाट्य परिषद ‘, बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडे , डॉ . राजेंद्र चव्हाण , देवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला .
पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राअभिनय , संघर्ष , कथानकाचं बीज , कथानक , कथानक आणि उपकथानकाची जोडणी , खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली . ती कौशल्ये देहबोली , संवाद , विसंगती , अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली . सभोवतालची माणसे , आजूबाजूला घडणाऱ्या घटना , चांगल्या गोष्टी कृतीत आणणे , आदी स्वत : च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा , हे ही कार्यशाळेत सांगण्यात आलं . यातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकर , प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला .
दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले , तर जितेंद्र रेडकर , ओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली . राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले . या मुलांशी पत्रकार कपिल प्रभू , अतुल कुलकर्णी , नितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधला . नाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितले . खेळातून कॉन्सन्ट्रेशन करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता .
गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते .. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली . यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर , युवराज अवसरमल , योगेश घाग , अभिजित जाधव यांनी संवाद साधला . गट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळस , भरत मोरे , मयुरी मोहिते , लीला हडप यांनी केले , तर नीता कुलकर्णी , अर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली .
चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा ‘ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ‘ मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते घेतली . शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद – वाचक अभिनय , भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले . त्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले . यात सहभागी झालेल्या शिक्षक व पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे , नरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधला . या चार गटातील विधार्थी , पालक , शिक्षक यांच्याशी चर्चा करून पत्रकारांनी आढावा घेतला .
दुपारच्या सत्रात ‘ शिरगांव हायस्कुल ‘, शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी ‘ धरतरी ‘, तसेच ‘ नाट्यसंस्कार कला अकादमी ‘, पुणे यांनी ‘ जीर्णोद्धार ‘, तर ‘ रंगभूमी अभियान ‘, तळेगांव यांनी ‘ माझी माय ‘ ही बालनाट्ये सादर करण्यात आली . यावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे , बेळगांव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित , अभिनेत्री सई लोकूर , संमेलन अध्यक्षा मीना नाईक , वीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
बालनाट्य सुरु होण्यापूर्वी जेष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल करदेकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली , तर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपील प्रभु यांनी घेत त्यांचा बाल नाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडून दाखविला .
मुंबईच्या ‘ बालरंगभूमी अभियान ‘ संस्थेतर्फे ‘ पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलनाचे ’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव ’ आणि ‘ फुलोरा बेळगाव ’ या संस्थांचे सहकार्य लाभले .
संमेलनाध्यक्ष मीना नाईक , उद्धघाटक सई लोकूर , स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे , बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर , अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण , सचिव देवदत्त पाठक , पत्रकार , शिक्षक , विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते .
Post Views: 52