केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत, गुणवंत महाविद्यालय म्हणून ‘यशवंत ‘ चे नाव आदराने घेतले जाते. शैक्षणिक, शिक्षणेतर, शिक्षणपूरक उपक्रम, संशोधन, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, संस्कृतिक, संगीत अशा प्रत्येक क्षेत्रात यशवंतने स्वतःचे ब्रँड आणि परिमाण निर्माण केले आहे.

२०१९ ला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी यशवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला आणि प्रशासनात, शैक्षणिक उपक्रमात, संशोधन क्षेत्रात, महाविद्यालयाच्या दर्जात्मक आणि संख्यात्मक परिस्थितीत आमुलाग्र बदल घडवून आणला. माजी प्राचार्य डॉ.बी. एस. ढेंगळे यांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थीभिमुख शैक्षणिक पर्यावरण निर्माण केले. शैक्षणिक आणि प्रशासकीय विकेंद्रीकरण आणि महाविद्यालयात कार्यरत प्रत्येक घटक; प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी; प्रत्येकाची जबाबदारी, कर्तव्य निश्चित केले. कर्तव्य पार पाडले तर त्याचे श्रेय स्वतःला; अन्यथा परिणामही स्वतःकडे; त्यामुळे कौशल्य दर्शविण्यास व वृद्धिंगत होण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक व्यक्ती, कर्मचारी काही नवीन उपक्रम करता येतील का? श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी आणि यशवंत महाविद्यालयाच्या यशामध्ये सिंहाचा वाटा, कमीत कमी खारीचा वाटा तरी उचलता येईल का? या दिशेने विचारचक्र गतिमान झाले. त्याचे परिणाम, निष्कर्ष समोर येऊ लागले.
महाविद्यालयाला सर्वप्रथम नॅकद्वारे ए प्लस मानांकन प्राप्त झाले. पीएम उषा योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे नाव आले आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांची रेलचेल सुरू झाली. प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांना पेटंट प्राप्त झाले तसेच इतर सहकारी प्राध्यापकांनीही त्यातून प्रेरणा घेऊन पेटंट प्राप्त करण्याकडे वाटचाल सुरू केली आणि यशस्विता प्राप्त केली.
एक महत्त्वपूर्ण नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे प्राध्यापकास परिषद, चर्चासत्र, सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी कर्तव्य रजेवर गेले असता मिनिट टू मिनिट अहवाल सादर करण्याची प्रथा सुरू केली. हेतू हा की, एखाद्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये काही नूतन उपक्रम असल्यास महाविद्यालयास तो ज्ञात होईल. यामुळे परिषदेतील प्रत्येक कार्यभाराकडे लक्ष देऊन त्याची लेखी नोंद घेण्याची उत्कृष्ट शैक्षणिक सवय लागली. केवळ प्रवचन ऐकल्याप्रमाणे परिषदेतील चर्चा व संशोधन ऐकू नये; तर त्याची नोंद घ्यावी, त्या परिषदेचे उद्दिष्टे, व्याप्ती, निष्कर्ष सविस्तर मांडला जावा. ज्याचा इतर सर्वांना लाभ होईल व परिषदेतील सहभागाची छायाचित्रे महाविद्यालयाकडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाकडे आपसुकच जमा होतील.
इतक्या सूक्ष्म स्तरावर शैक्षणिक विचार करण्याची सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काळात गरज आहे. शिक्षणक्षेत्राकडे, शैक्षणिक उपक्रमाकडे केवळ उपचार म्हणून न पाहता, कॅज्युअली न पाहता गंभीरपणे पाहिले जावे. शिक्षण क्षेत्र हा समाज व राष्ट्राच्या पाठीचा कणा आहे. जे देश विकसित आहेत, महासत्ता झालेले आहेत; ते केवळ शिक्षणाच्या आधारावरच, हे तत्त्व यातून प्रतिबिंबित होते.
नुकतेच महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील सुयश प्राप्त झालेले आहे. यशवंतच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. उत्कृष्ट नियोजन, प्रत्येकाचा सहभाग, उदात्त ध्येय व सुव्यवस्थित उपक्रम त्याचाच हा परिपाक आहे.
यशवंत महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनमध्ये एकूण आठ उपक्रमात रिसर्च हाइट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने १६८ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आणि यशस्वी कृतिशील उपक्रमांनी सहभाग नोंदविला होता. या उपक्रमात भारतातील जवळपास प्रत्येक घटक राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता.
हरित कॅम्पस हे केवळ शिक्षणाचे स्थान नसून ज्ञान आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे जिवंत उदाहरण असल्याचे ध्येय केंद्रबिंदू मानून प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली व डॉ. एल. व्ही. पदमाराणी राव यांच्या समन्वयाद्वारे संपन्न झाले.
या राष्ट्रीय स्तरावरील कृतिशील व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल यशवंत महाविद्यालयास प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पारितोषिकाने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल दर्जा, सन्मान व गौरवास प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. खा. श्री. अशोकरावजी चव्हाण यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहनाशिवाय यशाची शिखरे पादाक्रांत करणे अशक्यप्राय आहे. उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत यांचे सहकार्य शब्दातीत आहे.
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय,नांदेड.
