नांदेड:( दि.२९ मे २०२६)
त्यागमूर्ती माता रमाईंनी केलेल्या प्रचंड त्यागामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताला संविधान देण्याचे महानतम कार्य करू शकले आणि सामाजिक क्रांती, समता, न्याय, लोकशाही, धम्मक्रांती व मानवतावादाची रुजवणूक भारतात करण्यासाठी आयुष्यातील कणकण व क्षणक्षण देऊ शकले. माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार झाला, असे विचार यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी व्यक्त केले.
त्यागमूर्ती माता रमाई स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ व आयुध एमएस- सीआयटी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ मे रोजी श्रावस्ती नगर येथे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त डॉ. गौतम दुथडे यांनी, गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या तारखेकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे व आपल्या आवडत्या अभ्यासक्रमाची निवड करून यश संपादन करावे आणि देशाची सेवा करण्यात आयुष्य व्यतीत करावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात आंबेडकरवादी मिशनचे संचालक दीपक कदम यांनी तथागत बुद्ध यांनी माणसाचा सगळ्यात मोठा रोग शरीराचा नसून अविद्या असल्याचे प्रतिपादन केले तसेच गुणवत्ताधारक व ध्येयवादी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करावयाचे असल्यास आंबेडकरवादी मिशन त्यांचा संपूर्ण खर्च उचलण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले. मार्गदर्शक भदंत पय्याबोधि थेरो यांनी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्वांचे कल्याण आणि मंगलमय होण्याची भावना व्यक्त केली. एमकेसीएल मार्केटिंग हेड प्रशांत दुधमल यांनी उपस्थितांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शविले.
याप्रसंगी विचारमंचावर ग्रंथदानाचा ध्यास घेतलेले इंजि. डी.डी. भालेराव, संगीता भालेराव, महाराष्ट्र ग्रामीण बँक, नायगावचे व्यवस्थापक आनंद मुनेश्वर, राहुल गायकवाड, सुरेखा गायकवाड, सुषमा डोंगरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष लोखंडे व दीक्षा गजभारे यांनी केले सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राहुल गायकवाड, नितीन तारू, दिगंबर हनुमंते, भगवान गायकवाड, अजय सावंत, राहुल बहादुरे, उज्वला खिल्लारे, राजू बहिरे, नितीन पंडित, अरुण जमदाडे, राहुल शिंगारपुतळे, सोनू हनुमंते, मधुकर हनवते, गंगासागर होनसांगडे, कैलास जोंधळे, विष्णू ढगे, चरण जमदाडे, श्रीरंग गायकवाड, बबन दवणे, कपिल डाखोरे, प्रीती इंगोले, गजभारे आदींनी परिश्रम घेतले.
