महाराष्ट्रराजकीय
सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार:आमदार जयंत पाटील

गडचिरोली,प्रतिनिधी :-
पेसा आणि ग्रामसंभाविषयक कायदे पायदळी तुडवून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. हे बेकायदेशिर असून, त्याविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले.
शेकापतर्फे गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे नेते प्रा.एस.व्ही.जाधव, ॲड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री वेळदा, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाप्रमुख अक्षय कोसनकर,जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, पंचायत समिती सदस्य शीला गोटा, तुकाराम गेडाम, सावित्री गेडाम, दर्शना भोपये, माकपचे जिल्हा चिटणीस अमोल मारकवार यावेळी उपस्थित होते.
आ.जयंत पाटील पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात आहे. त्यावरच आदिवासींची उपजीविका चालते. परंतु भांडवलदारांमार्फत लोहखनिज उत्खनन करुन आदिवासींचा रोजगार हिरावला जात आहे, त्यासाठी पेसा कायदा आणि ग्रामसभांचे अधिकार नाकारले जात आहेत. प्रशासन आणि पोलिस नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून, पर्यावरणविषयक जनसुनावणीही दडपशाहीने करण्यात आली. याविरोधात आपण अधिवेशनात आवाज उठविणार असून, वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ, असे आ.पाटील म्हणाले.