https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी शेती, महिला, गायरान जमिनी आणि ५ च्या अनुसूचीसंदर्भातील महत्वाचे पाच ठराव समिती सदस्यांच्या अनुमोदनासह सर्वानुमते पारीत करण्यात आले.

शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ.श्यामसुंदर शिंदे, ज्येष्ठ नेते प्रा.एस.व्ही.जाधव, पुरोगामी महिला संघटनेच्या अध्यक्ष आशा शिंदे, मुंबई कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी मंचावर बाबासाहेब देशमुख, ॲड.राहुल देशमुख, बाबासाहेब कारंडे, काकासाहेब शिंदे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला संविधान दिनानिमित्त साम्या कोरडे हिने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन सर्वांना शपथ दिली. त्यानंतर अॅड.राजेंद्र कोरडे यांनी दोन दिवसीय बैठकीची रुपरेषा सांगितली. सुरुवातीला प्रा.एस.व्ही.जाधव यांनी ‘शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा’, असा पहिला ठराव मांडला. बीड येथील विष्णूपंत घोलप यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

यावेळी प्रा.जाधव यांनी शेतीसंदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन केले. गेल्या ७० वर्षांत शेतमालाचे उत्पादन ५० लाख टनांहून ३१५ लाख टनापर्यंत पोहचलं. मात्र, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही. आजवरच्या सरकारांनी व्यापक शेतीधोरण राबविलं नाही, ही बाब त्यासाठी कारणीभूत असल्याची टीका प्रा.जाधव यांनी केली. मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार शेतमाला हमीभाव देऊ शकत नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिलं. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्याही मोडीत काढल्या. कंत्राटी शेतीचा कायदा करुन गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अंबानी, अदानीच्या घशात टाकण्याचा डाव आखला, अशी टीका प्रा.जाधव यांनी केली.

महिला संरक्षण व सक्षमीकरण या विषयावर पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे यांनी दुसरा ठराव मांडला. कोल्हापूरच्या नेत्रदीपा पाटील यांनी यांनी त्याला अनुमोदन दिले. महिलांवरील अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर कायदेशिर कारवाई करावी, महिलांना स्वयंरोजगाराची व त्यांच्या सुरक्षेविषयी खास मोहीम राबवावी, दुर्बल घटकांतील महिलांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी खास उपाययोजना राबवावी इत्यादी मागण्या आशा शिंदे यांनी केल्या.

तिसरा ठराव आ.श्यामसुंदर शिंदे यांनी मांडला. गायरान जमिनीविषयीचा हा ठराव होता. रामदास जराते यांनी ५ व्या अनुसूचीतील अधिकारांची अंमलबजावणी करण्याविषयी चौथा ठराव सादर केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शंभर टक्के भरपाई द्या, असा पाचवा ठराव पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी मांडला. बाळासाहेब देशमुख यांनी त्यास अनुमोदन दिले.

या बैठकीला मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, कोकण अशा विविध भागांतील दीडेशहून अधिक प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. रविवारी(ता.२७) सकाळी ९ वाजता बैठक सुरु होणार असून, आणखी काही ठराव मांडण्यात येतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704