नांदेड : नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथे बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2025-26 निमित्त आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणि डोळ्यांत विरहाचे अश्रू दोन्हीही उमटवले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुग्रीव फड होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना कदम तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. मनीष देशपांडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने मंगलमय वातावरणात झाली. प्रास्ताविकात डॉ. संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवीन उमेदीची ज्योत प्रज्वलित करत “निरोप हा शेवट नसून नव्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे प्रेरणादायी विचार मांडले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली. राधिका कोकुलवार, गजानन राजरवाड, कृष्णा खरात, संभाजी तोटरे यांनी आपल्या भाषणातून मैत्री, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अविस्मरणीय क्षण यांची भावनिक उजळणी केली. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला आणि वातावरण भारावून गेले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुग्रीव फड यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रामाणिकपणा, कष्ट आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. “स्पर्धेच्या या युगात टिकायचे असेल, तर सर्वोच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
प्रा. डॉ. कल्पना कदम यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन करत महाविद्यालयातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारा खासकरून विद्यार्थ्याच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला ‘अर्थज्ञान’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. प्रा. डॉ. मनीष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा योग्य उपयोग केल्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल समाधान व्यक्त करत “येणारा काळ संधींनी परिपूर्ण आहे, त्याचा योग्य लाभ घ्या,” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साधना मुंडे हिने प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन कु. शिवानी यादव हिने मनोगतपूर्ण शब्दांत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. संतोष कोटूरवार व प्रा. डॉ. संदीप काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. आनंद, आठवणी आणि भावनांच्या संगमाने सजलेला हा सोहळा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
