*
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवक महोत्सवात सहभागी झाला. हा महोत्सव सत्यभामा विद्यापीठ, चेन्नई येथे संपन्न झाला. या महोत्सवात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत या ऐतिहासिक यशात मोलाचे योगदान दिले.
या दैदिप्यमान यशामागे डॉ. संदीप काळे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समर्पित मार्गदर्शन आणि अथक परिश्रम हेच यशाचे खरे आधारस्तंभ ठरले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती या यशामागील खरी ताकद ठरली. एक कुशल संघ व्यवस्थापक, प्रेरणादायी मार्गदर्शक आणि प्रभावी प्रशिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी सक्षम केले.
गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी सातत्याने संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून कार्य करत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवून दिली आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाची सांस्कृतिक क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून, अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीची भक्कम पायाभरणी त्यांनी केली आहे.
या गौरवप्रसंगी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांनी डॉ. संदीप काळे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कार्यातील निष्ठा, शिस्त आणि उत्कृष्टतेचा ध्यास यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला असून, ते महाविद्यालयासह संपूर्ण विद्यापीठासाठी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार काढले.
चेन्नई येथे संपन्न झालेल्या या महोत्सवात महाविद्यालयातील स्वाती कंधारे हिने क्रिएटिव्ह डान्स, मूक अभिनय आणि विडंबन या तीन प्रकारांत पारितोषिके मिळवली. चिन्मय मठपती याने शास्त्रीय सुरवाद्य प्रकारात भारतातून द्वितीय क्रमांक पटकावला, तर गणेश कदम याने लोकसंगीत प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळवले. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरलेल्या लोकनृत्य स्पर्धेत संदीप कोडापे, रितेश मडावी आणि पीयूष तोडसाम यांनी अप्रतिम सादरीकरण करत भारतातून प्रथम क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
या दैदिप्यमान यशामागे प्रा. डॉ. संदीप काळे यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून कार्य करत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवून दिली आहेत.
या यशाबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, सचिव ॲड. वनिताताई जोशी, कोषाध्यक्ष मा. कैलाशचंद काला, प्रभारी प्राचार्य डॉ. सुग्रीव फड, डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मनीष देशपांडे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बिभीषण करे, प्रा. नंदकुमार साखरकर, श्री. भुजंगराव करडखेडकर, श्री. तातेराव वाकोडे, श्री. मल्हार लाटकर, श्री. सुनील जोशी तसेच इतर मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व डॉ. संदीप काळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
