नांदेड : (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर) मराठी अर्थशास्त्र परिषद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्र पंडित पां. वा. गाडगीळ व्याख्यानमाला अंतर्गत “विकसित भारत २०४७ : आत्मनिर्भरेकडून महासत्तेकडे?” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विकास सुकाळे होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडापासून आजपर्यंत झालेल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. विकसित भारत होण्याच्या वाटचालीतील विविध अडचणी स्पष्ट करताना भारत भविष्यात महासत्ता बनू शकतो, यावर त्यांनी ठामपणे भाष्य केले.
यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह व खजिनदार प्रा. डॉ. मारुती तेगमपुरे यांनी पां. वा. गाडगीळ यांच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. लोणारकर यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार बोधगिरे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. शालिनी कदम, प्रा. बाबुराव जाधव, प्रा. संदीप जाधव, प्रा. गायकवाड, प्रा. भोशीकर, प्रा. पवळे, प्रा. नायर, प्रा. मठपती, प्रा. सोळंके, प्रा. आदमाने तसेच संकुलातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रा. शिवाजी गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
