नांदेड : रेल्वेच्या पार्सल विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडहून ग्वालियरला पाठविण्यात आलेली एमएच २६ सीजे ९१६५ क्रमांकाची दुचाकी तब्बल १२ दिवस मालकाच्या ताब्यात पोहोचली नाही. सचखंड एक्सप्रेसने ७ फेब्रुवारी रोजी दुचाकी रवाना केली; नियमानुसार ती ८ फेब्रुवारीला ग्वालियर येथे उतरविणे अपेक्षित होते. मात्र तेथील पार्सल विभागाने दुचाकी उतरवून घेतली नाही.दरम्यान,९ फेब्रुवारीला परतीच्या प्रवासातही ती उतरवली गेली नाही आणि दुचाकी गेली तशी नांदेडला परत आली. १० फेब्रुवारीला पुन्हा ग्वालियरला पाठवली असता अमृतसरपर्यंत जाऊन परत पार्सल विभागाने तोच कित्ता पुन्हा गिरवला. अखेर १५ फेब्रुवारीला फिरोजपूर एक्सप्रेसने पाठवल्यानंतरच दुचाकी अपेक्षित ठिकाणी पोहोचली. मात्र यासाठी तब्बल १२ दिवस प्रतिक्षा संबंधित दुचाकी मालकाला करावी लागली. या काळात संबंधित मालकाला प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि वेळेची नाहक हानी सहन करावी लागली. या प्रकारामुळे रेल्वे पार्सल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
………
ना दाद ना फिर्याद
रेल्वे हे प्रवासाचे सुलभ, सुरक्षित व गतीमान साधन असले तरी या विभागाची आर्थिक भरभराट प्रवाशांपेक्षा माल वाहतूकीतून आहे. अशावेळी माल वाहतूक सेवेत तत्परता असणे अपेक्षित आहे. एक दूचाकी रेल्वेने पाठवायची झाल्यास त्यासाठी वातानुकलीत प्रथम श्रेणीच्या प्रवासाईतके भाडे आकारले जाते. मात्र वाहन असो की पार्सल अतिशन निष्काळजीपणे हाताळले जाते. पार्सल पाठवले म्हणजे आमची जबाबदारी संपली, तुमचे वाहन पोहोचले की नाही याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून या विभागातील अधिकारी नामनिराळे होतात. केवळ पार्सल विभागच नव्हे तर रेल्वे मंत्री, रेल्वे मंत्रालयसुद्धा प्रवाशांच्या तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही.
