नागपूर,प्रतिनिधी :-
लोकजागर अभियान तर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यात ‘दहा लोकसभा, दहा पदयात्रा’ आयोजित करण्याचे ठरले आहे. राजकारणाचे शुद्धीकरण व्हावे, युवकामधून नव्या दमाचे अभ्यासपूर्ण, स्वाभिमानी आणि स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व पुढे यावे, यासाठी ’पॉलिटिकल युवा सत्संग’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबत नियोजन करण्यासाठी नुकतीच विदर्भव्यापी बैठक नागपूर येथील रवीभवन मधे उत्साहात संपन्न झाली. या आगळ्या वेगळ्या बैठकीला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर, हे होते.
प्रत्येक लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा येतात. प्रत्येक विधान सभा क्षेत्रात दहा – बारा जिल्हापरिषद आणि जिल्हापरिषद मतदारसंघात प्रत्येकी दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात. विदर्भाच्या ११ जिल्ह्यात १० लोकसभा आणि ६२ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभेसाठी एक मुख्य संयोजक आणि सहा विधासभेमधून प्रत्येकी एक संयोजक अशी, संयोजन समितीची रचना असणार असणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी हेच सूत्र लक्षात घेवून संयोजन समित्या बनविण्यात येणार आहेत.
आपण निवडून दिलेले खासदार देशासाठी आणि आमदार राज्यासाठी कायदे करण्याकरिता निवडून दिलेले असतात. पण बहुसंख्य खासदारांना-आमदारांना..शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, पर्यावरण, धर्म, न्यायालयीन व्यवस्था, महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय याबद्दल माहिती नसते. अभ्यास नसतो. कोणत्याही प्रस्थापित पक्षाकडे काळाची आव्हानं पेलण्यासाठी ठोस असा कोणताही कार्यक्रम नाही. लोकप्रतिनिधींनाच काही माहीत नसेल, तर हे प्रश्न कोण सोडवणार ?
म्हणून नव्या भारताच्या निर्मितीसाठी ’लोकजागर’तर्फे बारा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. (त्यावर ’समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ हे २३२ पानांचे पुस्तक देखिल प्रकाशित करण्यात आले आहे) वरील मुद्यावर सखोल चर्चा व्हावी, जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला जावा, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, नवा भारत घडविण्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात नव्या दमाचे नेतृत्व पुढे यावे, यासाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा लोकसभा मतदार संघामधे क्रमाक्रमाने दहा पदयात्रा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ही पदयात्रा सर्व समतावादी, लोकशाहीवादी लोकांसाठी खुली आहे. पक्ष/संघटन वगैरेंचे कुठलेही बंधन नाही. असेही प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले.
केंद्रीय संयोजन समिती मध्ये
डॉ. रमेश गजबे, रविकांत तुपकर, अहमद कादर, प्रभू राजगडकर, मनीष नांदे, दिनेश काथोके, रमेश वरुडकर, सुधीर शंभरकर, राम वाडिभस्मे, भोला सरवर, अभिजित डाखोळे, रविकांत खोब्रागडे, चेतन काकडे, रूपेश हलमारे, प्रतिक रामटेके, संजय बुल्ले यांचा समावेश आहे.
लौकरच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अशा विभागीय समित्या गठित करण्यात येतील.
प्रत्येक पदयात्रा साधारणपणे बारा दिवसांची असेल. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या अन्य भागात नियोजन करण्यात येईल. तसेच महाराष्ट्राबाहेर छत्तीसगढ, मध्यप्रदेश वगैरे लगतच्या प्रदेशात देखिल ’पॉलिटिकल युवा सत्संग’ आणि पदयात्रांचे आयोजन करण्यात येईल. युवक – युवती आणि जनतेने त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. सभेचे संचालन प्रदेश सचिव नंदकिशोर अलोणे यांनी तर आभार प्रदर्शन मनिष नांदे यांनी केले.
लोकजागरचा बारा कलमी कार्यक्रम
१) माझा धर्म माझ्या घरात, माझ्या मनात !
२) झिरो ते हिरो अर्थव्यवस्था ३) जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही ४) गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार ५) कृषी धर्म, कृषी संस्कृती ६) सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार ७) मोफत शिक्षण, मोफत आरोग्य ८) एक गाव, एक परिवार ९) युवा भारत, नवा भारत १०) गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय ११) प्रगत महिला, समर्थ समाज १२) सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता या सभेला माजी मंत्री डॉ रमेश गजबे, अहमद कादर, प्रभू राजगडकर, दिनेश काथोके, भोला बैसवारे, रमेश वरुडकर, सुधीर शंभरकर, नंदकिशोर अलोणे, मनिष नांदे, श्रीकांत बाभुळकर, प्रा. अभिजित डाखोरे, अनिल बजाईत, भोला सरवर, प्रणय बोरकुटे, रविकांत खोब्रागडे, प्रतिक रामटेके, बाळकृष्ण तुरणकर, विशाल आसुटकर आदी उपस्थित होते.