नांदेड:दि.10 फेब्रुवारी: येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड जमीन विकासासाठी विशेष युवक शिबिर,लिंबगाव ता.जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना *डॉ.आनंद आष्टूरकर यांनी जलस्त्रोत पर्यावरण आणि समाजप्रबोधन* या विषयावर विचार मांडले. डॉ.आष्टूरकर पुढे म्हणाले की,जीवन जगत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण सुरळीत असेल तर जीवन सुरळीत होईल अन्यथा आमच्या समोर अनेक संकटे उभे राहतील त्यामुळे जगातील कोणत्याही व्यक्तीने जलसंधारणाच्या बाबतीत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. जसे जीवनाला वळण आवश्यक आहे अगदी त्याच पद्धतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा मानवाला आणि त्याच्या जगण्याला वळण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय मानवी जीवनाला आणि निसर्गाला समतोल साधता येणार नाही असे ते म्हणाले. या संदर्भात उदाहरण देताना त्यांनी स्वित्झर्लंड या देशाचे उदाहरण दिले. खरंतर अत्यंत छोटेखानी असलेला हा देश पण पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत आणि जलसंवर्धनाच्या बाबतीत त्यांचा आदर्श जगाने घ्यावा अशा प्रकारचा आहे. भारतीय माणसांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी भारतामध्ये शिक्षण, जागृती आणि सेवानिष्ठता अत्यंत आवश्यक आहे.शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व, पाण्याचे महत्व माणसाला समजेल आणि त्यातूनच तो स्वतःचा विकास करू शकेल आणि निसर्गाचा समतोल राखू शकेल असे ते म्हणाले. याप्रसंगी वैशाली शिरशिकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना उपदेश दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. के. जे. कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र मेश्राम सर होते. या वेळी विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रशेखर एंगडे,डॉ.आशा मेश्राम, डॉ.अतिश राठोड आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशी घोरपडे हिने केले तर आभार कु.अंकिता तोमर या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा वर्ताळे, विठ्ठल गायकवाड, संभाजी तोटरे, गजानन राजरवाड,शेजवळ देशमाने,तन्वी पवार,सलोनी चौदंते,अपेक्षा चौधरी आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
