नांदेड: (दि.७ फेब्रुवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या अत्यंत समकालीन व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विशेष व्याख्यानासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील हिंदी साहित्य विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. कोमलकुमार परदेशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. परदेशी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानातून, हिंदी भाषेचे बदलते स्वरूप, तिची वाढती उपयुक्तता आणि रोजगारनिर्मितीतील महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. कोमलकुमार परदेशी यांनी स्पष्ट केले की, आजच्या जागतिकीकरण, डिजिटलायझेशन आणि माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात हिंदी भाषा केवळ साहित्य, अध्यापन किंवा पारंपरिक क्षेत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पत्रकारिता, अनुवाद, प्रशासन, दूरदर्शन, चित्रपट, रेडिओ, जाहिरात, जनसंपर्क, सामाजिक माध्यमे, वेब मीडिया, कंटेंट रायटिंग, सबटायटलिंग, भाषांतर सॉफ्टवेअर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्ये हिंदी जाणणाऱ्या कुशल युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा ही केवळ अभ्यासाचा विषय न मानता ती कौशल्याधारित माध्यम म्हणून स्वीकारावी, लेखन, भाषांतर, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाशी सुसंगत भाषा-वापर यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण वाचन-लेखन आणि आधुनिक माध्यमांची माहिती घेतल्यास हिंदीच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, हिंदी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा पाया आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत हिंदी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असून युवकांनी तिच्या माध्यमातून स्व-रोजगार आणि रोजगाराच्या विविध संधींचा शोध घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साईनाथ शाहू यांनी प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. विद्या सावते यांनी केले.
या प्रसंगी इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअरविषयक प्रश्न विचारले, त्यांना डॉ. परदेशी यांनी समर्पक आणि मार्गदर्शक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
