https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नोकरी आणि भाकरीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी शिक्षणाने द्यायला हवी!

मोटिव्हेशनल स्पीकर किरण देशमुख यांचे प्रतिपादन

नांदेड : (दि.२५ ऑक्टोबर २०२३)

‘उपजीविकेसाठीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्याव्यात अशा अपेक्षा उच्च शिक्षणाकडून बाळगल्या जातात; सध्याच्या परिस्थितीत त्या अनाठायी नाहीत, असे मानले तरी केवळ उपजीविकेच्या विचारात अडकून पडण्यात तेजस्वी तारुण्याची शोकांतिका आहे; म्हणून उपजीविकेपेक्षा जीविकेचा शोध घ्यायला प्रवृत्त करुन नोकरी आणि भाकरीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी शिक्षणाने प्रदान करायला हवी’ असे प्रतिपादन मोटिव्हेशनल स्पीकर आणि अभ्यासू वक्ते किरण देशमुख यांनी केले.

यशवंत महाविद्यालयातील कै.डॉ.शंकरराव चव्हाण लेक्चर सीरीज आणि व्यक्तिमत्त्व विकास समितीच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे हे होते.

‘शिक्षण,नोकरी आणि आयुष्याची भाकरी’ या विषयावर बोलताना श्री देशमुख पुढे म्हणाले की,
‘प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतांना एकवेळ ते आपण का घेत आहोत, याबद्दल माहिती नसेल तर फार फरक पडत नाही; पण उच्च शिक्षण घेतांना ते घेण्यामागील हेतूंमध्ये स्पष्टता असायला हवी. अशी स्पष्टता नसल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील निराशा वाढत चालली आहे. ती कमी करायची असेल तर व्यवसाय आणि नोकरीपेक्षा आयुष्याची भाकरी कशी संपादित करायची, याचे शिक्षण अधिक मिळायला हवे.यासाठी करिअर आणि कला यांच्यातील अनुबंध पुनर्स्थापित करायला हवेत’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी
समाजाच्या बदलत्या गरजांचा वेध घेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण शिक्षण घ्यायला हवे, अशी मांडणी केली.

याप्रसंगी प्रीती भुताळे या विद्यार्थीनीने ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या स्वगताचा तर कृष्णा आनंदा वाघमारे या विद्यार्थ्याने ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’
या एकपात्री नाटकाच्या बहारदार प्रयोगाचे सादरीकरण केले.

लेक्चर सीरीजचे समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय अंजली मद्रेवार यांनी करुन दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गायकवाड या विद्यार्थीनीने केले.

या व्याख्यानासाठी डॉ.विजय भोसले,डॉ.सुभाष जुन्ने,डॉ.मदन अंभोरे,प्रा.अविनाश गायकवाड यांच्यासह अनेक प्राध्यापक तथा विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704