इतिहासाद्वारे मानवी प्रगतीसाठी मार्गदर्शन – डॉ.दादाराव पानपट्टे
*
नांदेड:(दि.१७ ऑगस्ट २०२३)
भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यातील कधी न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.या नात्याने वर्तमानकालीन वाटचालीसाठी व मानवी प्रगतीसाठी इतिहास मार्गदर्शन करीत असतो;असे उद्गार नायगावच्या शरदचंद्र कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रो.डॉ. दादाराव पानपट्टे यांनी यशवंत महाविद्यालय, नांदेडच्या इतिहास विभागाच्या वतीने बी.ए.प्रथम व एम.ए. प्रथम इतिहास वर्गात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित सत्रारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डाँ.एच.एस.पतंगे होते तर इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे तसेच डॉ.एस.एम.बिंदगे,प्रा.आर.जी. भोपाळे,प्रा.शितल सावंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. पानपट्टे म्हणाले की,इतिहासाचा आणि मानवी जीवनाचा अत्यंत जवळचा संबंध असून मानवाच्या प्रगतीला इतिहास नुसता मार्गदर्शनच करत नाही तर हातभार लावतो. इतिहास हा विषय विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना, उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे यांनी, इतिहास आणि वाणिज्य शाखेचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट करत इतिहासाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. त्यांनी, महाविद्यालय व इतिहास विभागाची ओळख करून देत इतिहास विभागाची परंपरा आणि इतिहास विभागाची वाटचाल स्पष्ट केली. तसेच विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाच्या गुणवत्तेची परंपरा पुढील काळातही जपावी,अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस. एम.बिंदगे यांनी केले तर आभार प्रा.आर. जी.भोपाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ.अजय गव्हाणे,नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमास बी.ए.प्रथम व एम. ए.प्रथम इतिहास वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.