यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत एआय सी.सी.टी.व्ही ची नजर
नांदेड :प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२६ पदवी व पदव्युत्तर पदवी / प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या एआय (कृत्रीम बुध्दिमत्ता) आधारीत निगराणीत प्रायोगिक तत्वावर पार पडणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात होण्यासाठी मा. कुलगुरु प्रो. डॉ. संजीव सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र.कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सर यांच्या नियोजनानुसार तसेच विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी मा. गोविंद कतलाकुटे सर व विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.भट्टुप्रसाद पाटील सर यांच्या विषेश निगराणीखाली परीक्षा पार पडणार असुन विद्यापीठ प्रशासनाने अद्यावत पाऊल उचलले आहे.
यासाठी मुख्य नियंत्रण कक्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व नांदेड विभागीय केंद्रातुन प्रत्येक वर्गातील संशायस्पद हालचाली अथवा गैरप्रकारावर, प्रश्नपत्रिका डाऊनलोड / उत्तरपुस्तिका सलिंग या सर्वांवर नजर ठेवली जाणार आहे. नांदेड विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.
मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी प्रमाणपत्र परीक्षेला दि. 21 मे पासून सुरुवात झाली असून पदवी व पदव्युत्तर पदवी परीक्षेला दिनांक 27 मे पासुन नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांतील 87 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे एकूण 80 हजार 420 परीक्षार्थी सहभागी होणार आहेत.
परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाच्या वतीने 87 बहिस्थ पर्यवेक्षक (बैठे पथक) तसेच 11 दक्षता पथकांची एकूण 38 प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दक्षता पथकांमध्ये अनुभवी प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला असून परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित चार ही (लातुर, नांदेड, परभणी , हिंगोली) जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांकडे चोख पोलीस बंदोबस्ताची मागणीही विभागीय केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.
एआय सीसीटीव्हीच्या निगराणीत, दक्षता पथकांच्या देखरेखीखाली आणि कडक शिस्तीत या परीक्षा पार पडणार असल्याने यंदाची परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कॉपीमुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे.