नांदेड: प्रतिनिधी
नांदेड शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिकेचे उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्या आदेशानुसार व उत्तर विभागाचे पथक प्रमुख श्री दत्ता कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर व दक्षिण विभागाच्या पथकाने तसेच वाहतूक पोलीस विभागाचे श्री गाढवे व त्यांच्या टोईंग पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.या मोहिमेदरम्यान शिवाजीनगर ब्रिज ते जनता मार्केट,शिवाजीनगर मशीद,फुले मार्केट,आयटीआय परिसरापर्यंतच्या मुख्य रस्त्यांवर व फुटपाथवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.रस्त्यालगत व फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमण हटवून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे करण्यात आले.कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना समज देत सार्वजनिक रस्ते व फुटपाथवर दुकाने लावू नयेत,अन्यथा पुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल,अशा स्पष्ट सूचना दिल्या.या मोहिमेमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान,महाराणा प्रताप चौक परिसरात रस्त्यावर थांबणाऱ्या फळ विक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.संबंधित विक्रेत्यांना तेथून हटवून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.या संयुक्त कारवाईत उत्तर व दक्षिण विभागाचे कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच टोईंग पथकाने सक्रिय सहभाग घेतला.शहरातील इतर भागातही अशा अतिक्रमण हटाव मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
