नांदेड:(दि:१८ मार्च २०२६)
भगवान रजनीश मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युन, निळा रोड येथे सक्रिय ध्यान विश्वव्यापी महाअभियान दि.१ मार्च ते २१ मार्च दरम्यान आयोजित केले असून सध्या हे अभियान अंतिम टप्प्यात आहे.
दि. २१ मार्चपर्यंत सकाळी ७ ते ८ दरम्यान सक्रिय ध्यान नियमित संपन्न होत आहे. नियमित साधना करणाऱ्या जवळपास ३० साधकांना भगवान रजनीश यांच्या हस्ते संन्यासीत स्वामी गोपाळ भारती, माजी उपमहापौर प्रा. सुनील नेरळकर, शिबिर संचालक सुरेश धूत यांच्याद्वारे मार्गदर्शन आणि ध्यानाचे संचालन केले जात आहे.
सक्रिय ध्यान अभियानाच्या आयोजनाविषयी स्वामी गोपाल भारती यांनी, संपूर्ण जग युद्धाच्या सावटाखाली असताना युद्धास केवळ ध्यान हा एक पर्याय आहे, असे मत व्यक्त केले. प्रा.सुनील नेरळकर यांनी, विश्वात नेहमी युद्ध हे चालू असते. विविध भागात होणाऱ्या युद्धाने जग होरपळून निघत आहे. शेकडो निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. ध्यानाद्वारे अहंकार, स्वार्थ, हिंसा संपते; म्हणून ध्यानास दुसरा कोणताही पर्याय नाही, अशी भावना व्यक्त केली. श्री. सुरेश धूत यांनी, नांदेड कम्युनमध्ये नियमित ध्यान करणाऱ्या साधकांची संख्या वाढत असून नांदेडकरांनी या उर्वरित ध्यान अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ध्यान साधक डॉ.अजय गव्हाणे यांनी, भगवान रजनीश यांच्याद्वारे निर्मित विविध ध्यान प्रयोग आधुनिक माणसाची मानसिक, भावनिक जडणघडण लक्षात घेऊन निर्मित करण्यात आलेले आहेत. ध्यानाद्वारे शांतता, अहिंसा, समता, करूणा, स्थितप्रज्ञता प्राप्त होते, असे विचार व्यक्त केले.
नियमित ध्यानधारणा करणाऱ्या साधकांमध्ये स्वामी प्रशांत, सुगंधा, प्रीतम, प्रा.महेंद्र देशमुख, संगीता देशमुख, अलका मोरे, श्यामसुंदर मोतेवार, प्रा. गोविंद गव्हाणे, प्रा. नारायण शिंदे, अमृता मुखेडकर, रामप्रसाद बजाज, डॉ.रवींद्र देशमुख, प्रकाश चेके, लक्ष्मीकांत वानखेडे, आनंद मुदगलकर, व्यंकटेश काळे, विजय म्हस्के, शिवराज कांबळे आदी साधकांचा समावेश आहे.
