एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला:”सैनिकांस पत्र”
सैनिकांस पत्र
**************************
भारतभूमीचे निधड्या छातीने रक्षण करणा-या माझ्या सैनिक बांधवांना माझे कोटी कोटी प्रणाम!
भारतीय सणांच्या दिवशी जेव्हा विशेष गणवेशात तिरंग्याला कडक सलाम ठोकताना आम्ही तुम्हाला पाहतो तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो.देशप्रेमाचे रोमांच आमच्याही अंगी उभे राहते.तुम्ही आपल्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच सज्ज असता.तुम्ही सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या भारत देशाचे रक्षण करता.तुमच्यामुळेच आम्ही सर्व शांतपणे झोपू शकतो.तुम्ही सैनिक आहात हिच भावना तुमच्यात असते.धार्मिक विडंबनेचा तर तुमच्यात लवलेशही नसतो.भारतमातेचे रक्षण करणे हेच तुम्ही तुमचे प्राथमिक आणि पवित्र कर्तव्य मानता.
आम्हाला माहित आहे की सैनिक लगेच बनता येत नाही.त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.ज्या व्यक्तीच्या मनामध्ये खरोखरच आपल्या देशाविषयी प्रेम आणि वेळप्रसंगी स्वतःचे प्राण द्यायचीही तयारी असते असेच व्यक्ती सैनिक होऊ शकतात.आम्ही आमच्या घरात बसून दोन सुखाचे घास खावू शकतो ते केवळ तुमच्यामुळेच.तुम्ही आपले घरदार,आप्त स्वकीयांना सोडून देशासाठी आपले कर्तव्य बजावता.म्हणूनच आम्ही निर्धास्त राहू शकतो.आयुष्यभर तिरंग्याचा मान राखून त्याच्या रक्षणार्थ झटत असता.किती नशीबवान आहेत त्या माता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला.देशातील सर्व माता भगिनींना तुमचा सार्थ अभिमान आहे.आम्ही देशवासी तुमच्या उदंड आयुष्याची कामना ईश्वराकडे करतो.कणभर जरी देशसेवा आम्हाला करायला भेटली तरी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजू.मी तर ईश्वराकडे पुढचा जन्म सैनिकाचा मिळावा असे मागणे मागते.जेणेकरून हा जाज्वल्य देशाभिमान मला अनुभवता येईल.तुमच्यासारखे धैर्य आम्हाला मिळो हीच प्रार्थना मी देवाला करते.अखंड देशसेवा करणा-या सैनिकांना माझा सलाम!
“जय हिंद”
**************************
लैलेशा भुरे
नागपूर