सृजनशिल, सज्जन व सकारात्मक: डॉ. विश्वाधार देशमुख (लेखक:डॉ.अजय गव्हाणे
सृजनशिल, सज्जन व सकारात्मक: डॉ. विश्वाधार देशमुख*
(लेखक:डॉ.अजय गव्हाणे
दिवसेंदिवस सज्जन, सृजनशील माणसांची वानवा होत चालली आहे. सध्याचा काळ हा भयावह काळ असून ज्यांच्यावर विश्वास ठेवल्यास तो सार्थ ठरेल;अशी माणसं दुर्मिळ होत आहेत. माणसं चांगली असली तर ती सुजनशील नसतात व सृजनशील असतील तर चांगुलपणाची खात्री देता येईल; असे नाही. या काळात आपल्या व्यक्तिमत्त्वात विद्वत्ता, सज्जनता आणि विनम्रता यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या बहुआयामी व विद्यार्थी हितासाठी सतत उपक्रमशील असणाऱ्या आणि आपल्या रसमधूर वाणीने अखंड वाहत अनेक विद्यार्थी व मित्रांचा आधार असणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.विश्वाधार देशमुख.
मराठीतील नवसाहित्यिकांच्या यादीतील अग्रगण्य नाव, केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ज्यांची गणना सर्वदूर केली जाते; असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.विश्वाधार देशमुख.
भाषा, साहित्य व विचारांच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणातील विविध विषयांवर लेखणी व वाणीच्या माध्यमातून परखड, ओजस्वी भाष्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विश्वाधार देशमुख.
शक्यतो कोणतीही व्यक्ती एक प्रखर व प्रभावी गुण बाळगून असतो. सर्व चांगले लिहिणारे चांगली वक्तृत्व शैली असणारे असतीलच असे नाही. चांगली वक्तृत्व शैली असणारे लेखनाचा दर्जा कायम बाळगूनच असतील; असेही नाही. मात्र वक्तृत्व, लेखन, संशोधन,काव्य, वैचारिक उंची या गुणांनी युक्त व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.विश्वाधार देशमुख.
त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, शिमलाची संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त आहे. मुख्य बाब म्हणजे ही शिष्यवृत्ती भारतातून दरवर्षी केवळ सोळा अभ्यासकांनाच प्रदान केली जाते. त्यामधील डॉ.विश्वाधार देशमुख यांचे नाव भूषणावह व अभिमानास्पद आहे. त्यांनी सध्या ‘प्रादेशिक भाषेतील साहित्यातून प्रतिबिंबित होणाऱ्या भारतीयत्वाचा शोध’ या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी अखंड वाहून घेतलेले आहे. तुलनात्मक साहित्य, भाषांतर अभ्यास, माध्यमांतर ही त्यांची आवडीची अभ्यासक्षेत्रे. त्यांनी आजपर्यंत विविध संशोधनपर नियतकालिकांमध्ये उपरोक्त अभ्यास क्षेत्रावर निवडक संशोधनात्मक लेखन केलेले आहे. विविध वर्तमानपत्रातून नियमित स्तंभलेखन हा त्यांचा हातखंडा.
त्यांची आजपर्यंतची प्रकाशित साहित्य पाहिल्यास त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा आपसूकच परिचय होतो. वाहतो कवितेची पालखी हा काव्यसंग्रह, यात्रा हा स्तंभलेखनपर ग्रंथ, अन्वयार्थ हा वैचारिक ग्रंथ, दिंडी हे संत साहित्य विषयक लेखन, ‘तुलनात्मक साहित्य अभ्यास: नारायण सुर्वे आणि धुमील’ हा संशोधनात्मक ग्रंथ, वैचारिक साहित्य आणि भाषा विज्ञान अभ्यास अशी पुस्तके प्रकाशित आहेत.
डॉ. विश्वाघार देशमुख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मराठी अभ्यास मंडळाचे २०२३ ते २७ या कालावधीत माननीय कुलगुरू नामनिर्देशित सदस्य आहेत. त्यांचा एक उल्लेखनीय प्रयोगशील उपक्रम आहे. कल्पक विद्यार्थी समूहाच्या सोबतीने मागील दहा वर्षापासून वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा वाचन कट्टा हा उपक्रम चालू आहे.
कोरोना काळातही त्यांची उपक्रमशीलता बोथट झाली नाही. या काळात संगणक, भ्रमणध्वनी आणि इंटरनेटच्या साह्याने विचारशलाका, युवा मनवंतर आणि अभिरुची या तीन युटयुब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्रित अभ्यासपूरक उपक्रमांची निर्मिती केली. वरील मंचावरून जवळपास ५५० कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले. या उपक्रमाची महाराष्ट्रातील ख्यातनाम चॅनल्सने आवर्जून दखल घेतली.
शब्द आणि भाषा हेच धन मानून या अवलियाने या धनाची कुबेराप्रमाणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दोन्ही मुक्त करांनी उधळण केली. त्याचे समाधान व हास्य सदैव त्यांच्या मुखमंडळावर अवतरीत असते. संत साहित्य, बदलते नातेसंबंध, उच्च शिक्षण आणि तरुणाईचे प्रश्न अशा विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत सभा जिंकलेल्या आहेत.
अशा या बहुआयामी, चतुरस्त्र, अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
-प्रा.डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय,
नांदेड