एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला :”वृध्द”
वृध्द
बदलत्या काळानुसार समाजापुढे नवनवे प्रश्न उभे राहत असतात.आजच्या विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे माणसाने विविध आजारांवर मात केली आहे.ज्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढलेले आहे.त्यामुळे देशातील लोकसंख्येत वृध्दांची संख्याही वाढलेली आहे.आपल्या समाजात विभक्त कुटुंब ही परंपरा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आजचे कुटुंब चौकोनी असते.त्यामुळे घरातील, समाजातील वृध्दांचा प्रश्न प्रकर्षाने उभा राहतो.आपल्या देशातील बरेच तरूण, विशेषतः उच्चविद्याविभूषित परदेशात स्थायिक होतात.त्यामुळे बरेचदा त्यांच्या वृध्द मात्यापित्यांना आधाराची गरज असते.कधी नवरा- बायकोपैकी जर एकाचा मृत्यू झाला तर त्या वृध्दाला एकाकी जीवन जगावं लागतं.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे घरात खूप माणसं असायची.ती माणसे घरातील वृध्द,अपंग ,आजारी माणसांची काळजी घेत असत.कुटुंब एक अशी भावना असे, ज्यामुळे या गोष्टी जिव्हाळ्याने होत होत्या.आजकाल कुटुंबात मोजकीच माणसे असतात.आजची स्त्री नोकरीसाठी घराबाहेर पडते.मग अश्यावेळी वृध्दांची काळजी घेणारं घरात कोणीच नसतं.सर्वच क्षेत्रात जग इतक्या गतीने पुढे जात आहे की घरातील माणसांची साधी चौकशी करायला सुध्दा एकमेकांना वेळ नसतो.या गतिमान जगात वृध्दांसाठी वेळ द्यायला तरूणांना वेळच नसतो.
खरे पाहता बालपण,तारूण्य, प्रौढावस्था आणि वृध्दत्व हे निसर्गनियम आहेत.घरातील तरूण लोक हे विसरतात की ते देखील एक दिवस वृध्द होणार आहेत.काही वृध्दांची आर्थिक स्थिती उत्तम असते.पण त्यांना मायेच्या माणसांचा आधार नसतो.काही सामाजिक संस्था वृध्दांसाठी वृध्दाश्रम काढतात आणि तेथे येणारे वृध्द सुखसमाधानात राहतील याची काळजी घेतात.काही शहरांतून जेष्ठ नागरिक संघ स्थापन झाले आहेत.तेथे वृध्द वेळोवेळी एकत्र जमतात, आनंद सोहळे साजरे करतात आणि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अशी त्यांची वृत्ती असते.अशा या निकोप प्रयत्नातून समाजातील वृध्दांचे प्रश्न काही प्रमाणात का होईना सुलभ होत आहेत हेही नसे थोडके!
**************************
लैलेशा भुरे
नागपूर