फोंडाघाट – येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाणिज्य, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान, अकाउंटन्सी, लेखापरीक्षण तसेच व्यवस्थापन अशा विविध विषयांवरील प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या ज्ञानाची आणि बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली.
कार्यक्रमाची प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बाजीराव डाफळे यांनी केली. त्यांनी स्पर्धेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांतून स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान वाढते असे सांगितले.
ही स्पर्धा कोकण किंग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, गोदावरी, सह्याद्री, वनतारा आणि रायगड अशा एकूण सात गटांमध्ये घेण्यात आली. अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीनंतर स्पर्धेचा निकाल प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी जाहीर केला.
प्रथम क्रमांक – सिंधुदुर्ग गट (साक्षी गुरव, संगीता कांबळे), द्वितीय क्रमांक – रायगड गट (चेतन डोंगरे, शुभम सावंत), तृतीय क्रमांक – गोदावरी गट (प्रियंका मोंडकर, दीक्षा जाधव), उत्तेजनार्थ क्रमांक – कोकण किंग गट (देवदीप परब, यश सावंत)
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासक्रमापुरते ज्ञान पुरेसे नाही. अशा प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देतात. संघभावना, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. विद्यार्थी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम व्हावेत, ही अपेक्षा आहे.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे आणि प्रा. पल्लवी साटम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रूपाली पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
