नांदेड :
यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. महाराष्ट्राचे राजकारण,समाजकारण,अर्थकारण घडवत असताना राज्यात साहित्य व संस्कृतीचीही जडणघडण व्हावी, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.मराठी समाजमन विचार आणि विवेकाच्या बाबतीत संवेदनक्षम व्हावे यासाठी खास प्रयत्न केले.परंतु आजचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाकडे नजर फिरवली तर यशवंतरावांनी दिलेले पुढारलेपण महाराष्ट्र गमावून बसला आहे,हे दिसून येते आहे.अशावेळी तरुण पिढीने यशवंतराव चव्हाण यांचा वारसा समजून घ्यावा,त्यांच्या चरित्राचे डोळस वाचन करावे या हेतूने यशवंत महाविद्यालयातील वाचन कट्ट्याने
‘१२ मार्च ते १२ एप्रिल २०२६’ या कालावधीत तब्बल ३२ दिवस यशवंतराव चव्हाण लिखित ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्राचे अभिवाचन करुन त्यांना वैचारिक अभिवादन करण्याचा अनोखा उपक्रम घेतला.
यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील १२ मार्च १९१३ ते १४ एप्रिल १९४६ अशा तेहतीस वर्षांचे प्रतिबिंब ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात उमटले आहे.पुढील चार दशकांतील जीवनाचे चित्रण करणारे ‘सागरकाठ’ आणि ‘यमुनातट’ या नावाने आणखी दोन खंड प्रकाशित करावेत, असे नियोजन होते, परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे हे या पुस्तकांचे लेखन होऊ शकले नाही.परिणामी ‘कृष्णाकाठ’ हेच आता यशवंतरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला शब्दबद्ध करणारे आत्मचरित्र आहे. तरुण पिढीने या आत्मचरित्रात उमटलेल्या यशवंतरावांच्या पाऊलखुणांचा वेध घेऊन त्यावरून चालण्याचा प्रयत्न करावा,हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
बी.ए.द्वितीय वर्ष वर्गात शिकणाऱ्या गोदावरी वैजनाथ कानशुक्ले या विद्यार्थिनीने तब्बल ३१० पृष्ठांच्या या पुस्तकाचे बत्तीस भागांत विभाजन करुन प्रभावी पद्धतीने या आत्मचरित्राचे अभिवाचन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या प्रेरणेतून उपक्रमशील अध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना समन्वयातून आयोजित ‘आत्मचरित्राचे अभिवाचन’ हा उपक्रम ‘वाचन कट्टा’ या युट्यूब चॅनेलवर सर्व रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
