मानवतेसंदर्भातील संवेदना जागृत होणे अत्यंत गरजेचे – डॉ.कविता सोनकांबळे
नांदेड:(दि.१३ सप्टेंबर २०२३)
प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. अनैतिक व्यवहारासाठी मानवी तस्करी हा समाजाला लागलेला कलंक असून दरवर्षी देशातील असंख्य मुली, स्त्रियांचे अपहरण केले जाते. माणसाचे हे अध:पतन किळसवाणे असून माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या संवेदना जागृत असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभाग, मानवी हक्क अभ्यासक्रम आणि इंटरनल कमिटी अँड इक्वल अपॉर्च्युनिटी सेलच्या वतीने ‘मानवी तस्करी विरोधात जनजागृती’ या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षीय समारोपात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. साईनाथ बिंदगे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ.मीरा फड यांनी, आज सामाजिक, आर्थिक, शारीरिक हिंसेचे प्रमाण वाढलेले असून महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. पालकांमध्ये देखील त्या संदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गव्हाणे यांनी केले आणि आभार डॉ.वीरभद्र स्वामी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, आनंदा शिंदे, नाना शिंदे, संविधान कांबळे,गणेश विनकरे आदींनी सहकार्य केले. व्याख्यानास विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
———————————————-