हारेगाव प्रकरणातील जातीवादी गाव गुंडावर अट्रॉसिटीसह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करा
सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पंडित यांची मागणी
मानवत / प्रतिनिधी.
अहमदनगर जिल्ह्यातील मौ. हारेगाव येथे जातीवादी गाव गुंडानी दहशत पसरून बौध्द तरुणास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील जातीवादी गाव गुंडावर अट्रॉसिटी व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करावे व त्याची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी मानवत येथील सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पंडित यांनी मानवत तहसिलच्या तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे ३१ ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मौ. हारेगाव येथील जातीवादी गावगुंड युवराज गलांडे व त्याचे चार ते पाच साथीदार यांनी येथील बौध्द तरुण शुभम माघाडे यास कबुतर व शेळ्या चोरल्याच्या कारणा वरून त्यास झाडाला टांगून व नग्न करुन आणि त्यास थुंकीचाटण्यास लावून जबर मारहाण केली.
ही घटना या पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला अशोभनीय असून मानवतेला काळिमा फासणारी असून अत्यन्त घृणास्पद आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत या प्रकरणातील सर्वच आरोपीवर अट्रॉसिटी सह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करुन कायदेशीर कठोर कारवाई करावी आणि त्या सर्वच आरोपीची मालमत्ता शासनाने तात्काळ जप्त करावी आणि पीडित कुटूंबास पोलीस संरक्षण देऊन न्याय द्यावा अन्यथा सर्व आंबेडकरी समाजाचा वतीने लोक शाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनात दिला आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा ही दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पंडित, आदर्श धबडगे, राहुल कुंभकर, सुरज खरात, अनिल बुरखुंडे, कुंदन पारवे, प्रशांत पौळ, कृष्णा मोहिते, प्रितम ढवळे, मुज्जू शेख, अक्षय साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
***