एम सी आर न्यूज साहित्याचा महोत्सव” श्रीकृष्ण”
श्रीकृष्ण
**************************
सोळा कलांमध्ये पारंगत असलेल्या भगवान श्रीकृष्णाला लीलाधर असेही म्हणतात.सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ श्रीकृष्णाचे मनोरंजन जगभर प्रसिद्ध आहे.त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.श्रीविष्णूच्या दहा अवतारांपैकी आठवा अवतार श्रीकृष्णाचा होता.त्याच्या दहा अवतारांपैकी श्रीकृष्ण अवतार सर्वात अद्वितीय आहे.
कृष्ण एका गोपाळ कुटुंबात वाढला होता.तो गोपीकांसोबत खेळण्यात, त्यांना त्रास देण्यात,बासरी वाजवण्यात वेळ घालवत असे.कृष्ण खूप खोडकर होता.पण तो इतका आराध्य होता की कोणीही आई यशोदेकडे तक्रार केली तरी यशोदेला विश्वास बसत नसे.त्याचे निरागस आणि सुंदर रूप पाहून सगळेच विरघळायचे.महाभारताच्या युध्दात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भक्तीयोगाचा धडा शिकवला.७०० श्लोकांचा १८ अध्यायांचा ग्रंथ असलेल्या “श्रीमद्भगवद्गीता”च्या रूपाने त्यांनी संपूर्ण जगाला ज्ञान दिले.हा एक महान आणि अजिंक्य तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे जो आपण भारतीयांनी आपला अनमोल वारसा म्हणून घेतला आहे.श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने मानवाच्या सर्व समस्यांवर उपाय सांगितला
आहे.कुरूक्षेत्राच्या युध्दात कृष्णाने सर्वात महत्वाची भूमिका बजावली आणि अर्जुनाचा सारथी बनला.भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,”जेव्हा जेव्हा अधर्म डोके वर काढेल आणि धर्माचा नाश होईल, तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी वेगवेगळ्या युगात येत राहील.”
भगवान श्रीकृष्णाला समजून घेणे इतके सोपे नाही.एकीकडे तो मोठा जाणकार आहे तर दुसरीकडे तो खोडकर,चोरही आहे.तो महान योगी आहे तर त्याने रासही निर्माण केली आहे.
श्रीकृष्ण जसा श्रीमद्भगवद्गीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तसाच तो राधेशिवायही पूर्ण होऊ शकत नाही.श्रीकृष्णाचे राधेवर जेवढे प्रेम होते तेवढे बासरीवरही होते.श्रीकृष्ण आणि राधा यांच्यात बासरी दुवा होती असे म्हटले जाते.महाभारत ही घटना कालातीत आहे.म्हणजेच या घटनेवेळी श्रीकृष्णाने सांगण्यात आलेले तत्वज्ञान, कर्ममार्ग,धर्ममार्ग, भक्तीमार्ग आजच्या काळातही तंतोतंत लागू पडताना दिसतात.राधा कृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून, अध्यात्मिक प्रेम होय.राधेच्या कृष्णावरील निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती.तिच्या श्वासात कृष्णनाम होते.कृष्णभक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच नटखट कृष्णाच्या हृदयात,आत्म्यात ती सामावली होती.कृष्णाच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे.कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना कृष्णलीला म्हटले जाते.तो महाभारत,भागवत पुराण,बह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे.एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि वैश्विक सर्वोच्च अस्तित्व अशी त्याची अनेक रूपे आहेत.तो अनेक दंतकथांमधून प्रतिबिंबित होतो.भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे.कृष्णलीला आणि कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले.मनुष्याला कर्मे सुटत नाही.ज्ञानी माणसालाही सुटत नाही.म्हणूनच प्रत्येकाने आपापले कर्म केले पाहिजे मात्र फळाची अपेक्षा ठेवू नये असा संदेश त्याने गीतेत दिलेला आहे.त्याला या युगातील सर्वोत्तम पुरुष, युगपुरुष किंवा युगावतार म्हणून स्थान देण्यात आले आहे.गोकुळात प्रेम व स्नेहाचे वातावरण निर्माण करणारा, जरासंध व शिशुपालाचा नाश करणारा,द्रौपदीची विटंबना होत असताना तिच्या रक्षणासाठी धावून येणारा,अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकणारा अशी विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात.
प्रत्येक प्रवृत्ती सुंदर स्वरूप धारण करून जीवात्म्यास मोहीत करण्याचा प्रयत्न करीत असते.श्रीकृष्ण गोपींच्या बाह्य स्वरूपाने मोहित न होता गोपींना त्याने खरे स्वरूप दाखवून दिले.भ्रमर फुलाकडे जाणार, पतंग प्रकाशाकडे झेपावणार.त्याचप्रमाणे आपल्या प्रवृत्ती,शक्तींना एखाद्या ध्येयाप्रती वाहून घेणे आवश्यक असते याची जाणीव श्रीकृष्ण करून देतो.तो सर्व प्रवृत्तींना एकत्र करून ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवतो.यामुळे जीवनातील अशांतता संपुष्टात येते.मनाच्या गाभा-यात एकच स्वर उमटतो…. कृष्ण, कृष्ण, कृष्ण
**************************
लैलेशा भुरे
नागपूर