शिक्षकी पेशात आवाजाला अनन्यसाधारण महत्व: प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “करियर कट्टा” आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उपक्रमांतर्गत
‘आवाज गुरुजनांचा – वेध देशाच्या भवितव्याचा’ यावरील आवाजाची कार्यशाळा यशवंत महाविद्यालय येथे संपन्न झाली. सदरील आवाजाच्या कार्यशाळेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील 180 पेक्षा अधिक प्राध्यापकांनी घेतला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेशचंद्र शिंदे मा. प्र-कुलगुरू स्वा.रा.ती.म नांदेड तथा विद्यमान प्राचार्य यशवंत महाविद्यालय हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र महाराष्ट्र राज्य हे लाभले होते. सदरील कार्यशाळेसाठी मार्गदर्शिका सोनाली लोहार प्रसिद्ध आवाज तज्ञ मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करियर कट्टा चे नांदेड विभागीय समन्वयक प्रा. डॉ. सतीश चव्हाण यांनी केले. त्यांनी करियर कटाच्या अंतर्गत चालणारे उपक्रम तसेच ही कार्यशाळा प्राध्यापकासाठी कसा आगळावेगळा अनुभव राहील त्यातून प्राध्यापकांना कसा फायदा होईल याबद्दल त्यांनी आपले मत स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उद्घाटक यशवंत शितोळे यांनी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर चालणारा करियर कट्टा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे काम करतो, करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक, त्याचबरोबर विविध तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते, महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवकांना अगदी माफक दरात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आणि स्पर्धा परीक्षा तसेच उद्योजकतेचे अविरत मार्गदर्शन करियर कट्टाच्या माध्यमातून कशा प्रकारे केले जाते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयातील युवकांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढवा त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कौशल्याचा विकास करण्यासाठी उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करियर कट्टा अंतर्गत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयातून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असणारे पास आऊट आणि ड्रॉप आऊट विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या खाजगी आस्थापनामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या त्या उद्देशाने शासकीय आस्थापनाच्या सहकार्याने महाविद्यालय स्तरावर रोजगार मेळाव्या आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा व्यापक प्रयत्न करियर कट्टा उपक्रम अंतर्गत केला जातो असे त्यांनी यावेळी म्हटले. यशवंत महाविद्यालया मध्ये आयोजित आवाजाच्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शिका आवाज तज्ञ सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन करताना आवाजाची व्याख्या, अर्थ, आवाजाची निर्मिती या यावर सविस्तर मार्गदर्शन करताना कंठसुचीता अंतर्गत आवाज टिकविण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या काही टिप्स प्राध्यापकांना सांगितल्या जसे की, आवाजाची काळजी घेण्यासाठी दर 15 मिनिटांनी पाण्याचा एक घोट घेणे, जेव्हा बोलण्याची गरज नसेल तेव्हा बोलणे टाळणे, बोलतानाच्या हानिकारक सवयी मध्ये फोनवर मोठ्याने बोलणे, कारण नसताना किंचाळणे, ओरडणे, चेअरिंग करणे टाळले पाहिजे, समाजात आवाज बदल असलेले गैरसमज व त्यातून निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावर केले जाणारे उपाय यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपण जर आपल्या आवाजाची काळजी घेतली नाही तर त्यापासून कसे दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दलची जाणीव श्रोते वर्गांना करून दिली. आवाजाचा संबंध हा मेंदू, हृदय, फुफ्फुस या सर्व गोष्टीशी येतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आवाजाची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मा. प्र- कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी असे म्हटले की शिक्षकी पेशात आवाजाचे महत्व खूप असल्यामुळे प्रत्येक प्राध्यापकाने आवाजाची काळजी घेतली पाहिजे. आवाजाच्या निर्मिती त्याबद्दल त्यांनी शास्त्रीय पद्धतीने माहितीही उपस्थिताना दिली तसेच त्यांनी करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले. एवढेच नाही तर महाविद्यालयांना नॅक पुनर्मुल्यांकनामध्ये मध्ये करिअर कट्ट्या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमास असलेले महत्त्वही विशद केले. आवाजाच्या कार्यशाळेसाठी प्राचार्य प्रवर्तक डॉ. पंजाब चव्हाण, उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन साहित्यिक डॉ. विश्वधार देशमुख यांनी केले तर यशवंत महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा करियर कट्टा कार्यक्रमाचे नांदेड जिल्हा समन्वयक डॉ. अजय मुठ्ठे यांनी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवराचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक श्री संदीप पाटील, करियर कट्टा समन्वय समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. प्रवीण तामसेकर, प्रियंका सिसोदिया, भारती सुवर्णकार तसेच डॉ. प्रवीण सेलूकर डॉ. ज्ञानेश्वर पूपलवाड, डॉ. संतोष पाटील, डॉ. शिवराज आवाळे, प्रा. राहुल लिंगमपल्ले, प्रसिद्धी प्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी प्रयत्न केले.