जगण्याचा अन्वयार्थ लावणे हे ‘परिपूर्ण माणूस’ असण्याचे मानक– प्रा. विश्वाधार देशमुख*
मानवत / प्रतिनिधी.
पशु ते माणूस हा प्रवास सहजशक्य वा स्वाभाविक वाटत असला तरीही या प्रवासाची परिपूर्ती काही कठीण कसोट्या पार केल्यावरच होत असते. या प्रमुख अवस्थांमध्ये सौंदर्यात्मक गरज, ज्ञानात्मक गरज ,आत्मप्रचितीची आवश्यकता आणि अन्वयार्थाची निकड यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.
या अवस्थांच्या पूर्णतेतच माणूस असणे सिद्ध होते. त्यामुळे केवळ जन्माला आलो म्हणजे माणूस झालो हा चूकीचा ग्रह आहे असे प्रतिपादन *यशवंत महाविद्यालय, नांदेडच्या मराठी विभागाचे प्रोफेसर विश्वाधार देशमुख यांनी केले.* मानवत येथील के के एम महाविद्यालय , आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पूज्य *स्वामी रामानंद तीर्थ* विशेष व्याख्यानमालेचे मुख्य व्याख्याते या नात्याने *‘शोधयात्रा: आयुष्याच्या अर्थाची’* हा विषय मांडताना पुढे त्यांनी तिमिराकडून तेजाकडे, अभावाकडून सभावाकडे जाण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी डोळस बुद्धी व निरपेक्ष मनाची गरज अधोरेखित केली. अभ्यासपूर्ण मांडणीचे उत्तम उदाहरण देत क्लिष्ट वाटणारा विषय त्यांनी अत्यंत सहजतेने विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवला. आयुष्य ही सापेक्ष संकल्पना आहे असे नोंदवत त्यांनी मानवी आयुष्याचा खरा अर्थ त्याचे प्रयोजन आणि कुठे, कसे आणि का ? या मुलभूत प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरांत दडलेले आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकुमारजी कत्रुवार हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ किशोर हुगे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय व्याख्यानमालेचे समन्वयक प्रोफेसर दुर्गेश रवंदे यांनी करून दिला . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी मुंदडा हिने केले तर सर्व मान्यवरांचे आभार डॉ.विनायक जाधव यांनी मानले.
यावेळी व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***